गेल्या कोरोनाच्या पिरियड मधे बरीच काम झालीत. इतक्या वर्षांपासून कधीच एवढा फावला वेळ मिळालाच नाही असे नाही,पण नेहमीप्रमाणे आळस जास्त तो आजही कायम आणि टापटीपपणा कमी होता.
आज खूप महिन्यानंतर नव्हे वर्षानंतर माझा पसारा आवरायला घेतला. 12वी, डिग्री झाली की सगळा पसारा फक्त पोत्यामधे घालुन ठेवण्यात आला होता. आणि त्यात भर म्हणून आताचा पद्वित्युर हा बाकीचं. गेल्या काही वर्षांपासून असलेली पुस्तके, नोट्स, स्वलिखिते, झेरॉक्स, वह्या जे उगाच सांभाळून ठेवलंय ते बाजूला करून रूम बाहेर काढावे म्हटले.सुरुवात केली, दुपारपासून इकडचे तिकडे नि इकडचे इकडे करतोय, बघतोय नि बाजूला करतोय. दमछाक होतेय. यातच कित्येक जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
प्रत्येक नोट्स, झेरॉक्स, यावरील लिहलेले quotes, शायरी इत्यादी बगताना खूप भारी वाटतंय. मी स्वतःहून एवढ्या वर्षात एवढे सगळे वाचले नोट्स काडल्या होते यावर माझाच विश्वास बसत नाहीये. स्वतः काढलेल्या हस्तलिखित नोट्स, वह्या ज्या आता मलाही वाचता येईनात तर तीन पोते भरतील एवढ्या सापडल्या. जुन्या रूमवरील हा सामान रूम सोडताना रद्दिवाल्याला न देता तसाच दुसऱ्या ठिकाणी घेऊन आलो त्यामागेही एक वेगळंच सौख्य होत, हे सगळे एम.फॉर्म. पूर्ण करे पर्यंत गोळा केलेल आहे.
![]() |
| Finally I found it ! |
एक बाजूने प्रॅक्टिकली विचार केला तर या सगळ्या गोष्टी मी आयुष्यात पुन्हा कधीही वाचणार नाहीये हे मला ही चांगला ठाऊक आहे, तरीही इतके वर्ष मी हा पसारा का सांभाळत आहे हे मला कळत नाहीये मग डिस्पोस ऑफ करायला काय हरकत आहे?आणि खरेच हे सगळे बाजूला केल्यानंतर रूम कसा सुटसुटीत नि प्रसन्न वाटेल यात शंका नाही आहे.
यातच अचानक डोक्यात विचार आला की आपल्या मनाचे पण असेच काही झालेय का? कित्येक वर्षांपासूनच्या किती तरी अप्रिय आठवणींची जळमटे, विचारांचा गुंता, त्रासदायक घटना, मानसिक आघात, कुणाबद्दल तरी असलेला निरर्थक आकस, अनुत्तरीत प्रश्न, भविष्याचा वेध, इतराबद्दल असलेलं वाईट मत इत्यादी,...गोष्टी मनात आणि ह्रुदयात पसारा करून आहेत.
मग ते देखील साफ करायलाच हवे…कारण या सर्वांचा मला वर्तमानात सकारात्मक असा काहीही उपयोग होत नाहीये. झाला तर त्रासच होतो आणि दरवेळी नव्याने अधिक तीव्रतेने होत राहतो. आणि याचा भविष्यातदेखील खरच काही उपयोग होईल की नाही सांगणे अवघड आहे.
पसा-यात काही दुर्मीळ , विलक्षण आणि कायम स्वरुपी जपून ठेवणाऱ्या आठवणी सुद्धा असतात, हे मात्र विसरायचं नसत.
आधी मनातला पसारा आवरणे महत्वाचे! नाही का? रूम मधल्या डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टींचा पसारा आवरणे सोपे, त्यासाठी इतर कुणाची मदत घेणे देखील शक्य आहे. पण मनात नि मेंदूत असलेला अदृश्य, विस्कळीत नि असंबद्ध पसारा कसा आवरणार? त्यासाठी स्वतःलाच कधीतरी निश्चय पूर्वक पुढाकार घ्यावा लागणार. आणि हे जमले तर नक्कीच “विवेकानंदांना”अपेक्षीत असणारी अविरत शांतता आणि प्रसन्नता आपल्यालाही अनुभवता येईल.
बघुयात! जमतंय का मनातील पसारा आवरायला!!!
-Until next time!
Gaurav ☺️

मराठी भाषेवरील प्रभुत्व पाहून मनस्वी आनंद झाला . इंग्रजी शिकल्यानंतर जगासमोर आपण हुशार होतोच पण आत्मिक समाधान हे शेवटी मायबोलीतच असत . आज आपल्यातला आळशी मराठी लेखकाने खूप भारी पसारा आवरला 😀असो ,नेहमीप्रमाणे भारी !!
ReplyDelete😄 मायबोली ती मायबोलीच, तुमच्या सारख्या कवीचे उद्गार हे आमच्या साठी प्रेरणादायी आहेत. 😄🙏🏼
Delete